धारुर तालुक्यात अफूच्या लागवडीचे धक्कादायक प्रकरण उघडकीस
बीडच्या विशेष पथकाची कारवाई ; धारुर पोलिसांना त्याचा पत्ताच नाही
किल्ले धारुर : विश्वास शिनगारे
अफू पिकवण्यावर शासनाने निर्बंध घातलेले असताना देखील धारूर तालुक्यातील (जि.बीड) पिंपरवाडा येथील रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने चक्क बालाघाट पर्वत रांगेतील अतिशय दुर्गम अशा भागात तीन गुंठे क्षेत्रावर शेततळ्याच्या माध्यमातून पाणी संकलित करत अफुची शेती पिकवली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच बीड एलसीबी धारूर पोलिसांच्या मदतीसह तीन अधिकारी आणि बारा पोलीस कर्मचाऱ्यांची शोध मोहीम यशस्वी झाली आहे.
धारूर तालुक्यातील पिंपरवाडा गावच्या शिवारात पिंपरवाडा चोंडी तसेच जहांगीर या तीन गावांच्या केंद्रस्थानी असलेल्या ठिकाणी रामहरी तिडके नावाच्या शेतकऱ्याने चक्क अफूची शेती पिकवली आहे. याबाबत बीड एलसीबीकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर पथकाने तीन अधिकाऱ्यांसह 12 पोलीस कर्मचारी घेऊन दुपारी बारा वाजल्यापासून या ठिकाणी कार्यवाही सुरू केलेली आहे. सायंकाळी सहा वाजता त्या तीन गुंठे शेतीतील अफू उपटून घेण्यास सुरुवात केली आहे. अफू उपटून घेतल्यानंतर त्याचं जे वजन एकत्रित होणार आहे त्यानुसार किती लाखाचा मुद्देमाल पकडला याबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती दिली जाईल असं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी धारूर तालुक्यात अफूची शेती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अफूच्या माध्यमातून नशेखोरांना नशा करण्यास अफूचा उपयोग होतो आणि त्यासाठीच नशेखर अफूचा उपयोग करून घेतात. रामहरी तिडके यांनी शेततळे खोदून त्याच्याद्वारे अफूला पाणीपुरवठा करत अतिशय दुर्गम भागात जिथे सहज जाणं शक्य नाही अशा ठिकाणी अफूची शेती पिकवली आहे. अफू पिकवणे कायद्याने निर्बंध घातलेले असताना रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने अफूची शेती पिकवल्यामुळे पिंपरवाडा गाव चर्चेत आला आहे.
दुर्गम भागात शेततळ्याच्या आधारे अफूची पिकवली शेती
तालुक्यातील बालाघाट पर्वत रांगांमध्ये येत असलेल्या पिंपरवाडा गावाच्या शिवारात जहागीरमोहा पिंपरवाडा आणि चोंडी या तीन गावांच्या केंद्रस्थानी असलेल्या अतिशय दुर्गम भागात शेततळ्याच्या माध्यमातून तीन गुंठे जमीन ओलिताखाली आणत रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने अफू पिकवला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांनी तोफू एकत्र करण्यास सुरुवात केली आहे अंदाजीत 40 ते 50 गोण्यापेक्षा अधिक तिथे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.